डोक्यात दगड मारून महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 20) सकाळी आळंदी येथे उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. लग्नाचे वचन मोडल्याने महिलेची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. ज्ञानेश्वर गजानन इंगळे (वय ३१, रा. इंद्रायणी घाट, आळंदी, मूळ रा. कुटी पांगरी, मालेगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. खून झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर घुले यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दामल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर असलेल्या भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला. शनिवारी सकाळी 8 वा. घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. महिलेच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या. त्यामुळे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. आरोपी हा मूळचा वाशिम जिल्ह्यातील असून मागील दोन ते अडीच वर्षांपासून तो कामानिमित्त आळंदी येथे आला होता. मिळेल ते श्रम करून आळंदी घाटावर झोपायचे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आळंदी घाटात एक महिलाही मुक्कामी होती.त्या महिलेशी आरोपी ज्ञानेश्वर इंगळे याची ओळख झाली. खुनाच्या घटनेच्या आदल्या दिवशी दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याच दिवशी ही महिला एका अनोळखी व्यक्तीसोबत फिरताना दिसली. महिलेवर संशय आल्याने ज्ञानेश्वर इंगळे याने महिलेच्या डोक्यात सिमेंटने वार करून तिची हत्या केली. दिघी पोलीस तपास करत आहेत